Wednesday, August 15, 2007

बाळ गंगाधर टिळक


हे शीर्षक वाचुन तुम्ही म्हणाल,'टिळक ना? महान माणूस होता माहिती आहे! पण च्यायला हा काय नविन सांगणार आहे आता टिळकांबद्द्ल?'

नाव : बाळ गंगाधर टिळक
जन्मदिन : २३-०७-१८५६
स्थळ : चिखलगाव, रत्नांगिरी.

'हुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र, हे आम्हालाही माहिती होतं(चक्क!). १ ऑगस्ट १९२० रोजी ते पंचत्वास विलीन झाले. प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता तेव्हा मुंबईत त्यांच्या अंत्ययात्रेला. youtube वर पाहिलाय हो आम्ही त्यांचा video.'

माणूस खरंच ज्ञानी होता हा पण! त्यांचे गुरु, केरुनाना छत्रे त्यांना सूर्याचं पिल्लू म्हणायचे. बुद्धीचं तेज होतंच त्यांच्या तसं. सामान्य माणूस उजव्या मेंदुचा उपयोग फार कमी करतो. शास्त्रज्ञ १०-१५% करतात. लोकमान्यांनी २४% केला.......

गणितात तर त्यांचा व्यासंग होताच, त्याशिवाय राजकारण, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन,न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथांचा अभ्यास, त्यावर सखोल विचार व लेखन...एक ना दोन!

टिळक मुंबईला ज्या मित्राकडे राहायचे तो वैद्यकशास्त्र शिकायचा. त्याच्या घरी बसुन हेही जीवशास्त्रात घुसले. एकदा disection साठी बैलाच ह्रदय घेऊन आले. तेव्हा मात्र त्या मित्राने लोकमान्यांना गणितातंच व्यासंग करण्याचा प्रेमळ सल्ला दिला. असो!

टिळक जर शे-सव्वाशे वर्ष उशिरा जन्मले असते तर?
त्यांची शेंगांची गोष्ट आज आम्हाला सांगितली गेली नसती. ते लोकमान्य ह्या नावाने प्रसिद्ध झाले नसते. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असं लहान मुलांना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या भाषणात सांगायची संधी मिळाली नसती! बिचारे..... एक सच्चा नेता हरवून बसले असते!!
सार्वजनिक गणेशोत्सव झाले असते? शिवजयंतीवरुन वादही झाले नसते, कारण तोही उत्सव कदाचित टिळकांनी सुरु केला नसता. आणि इतर सुपीक टाळक्यांच्या डोक्यातही आलं नसतं. सावरकर,चाफेकरबंधुंसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला असता?

केसरी निघाला नसता,त्यातील पाश्चिमात्त्यांना हादरवून टाकणा-या अग्रलेखांना आज सगळे मुकले असते. गीतारहस्य,The arctic home in vedas वगैरेसारखे अव्वल दर्जाचे ग्रंथ लिहिले गेले नसते. गीतेवर टिका करणारे पुष्कळ आहेत. पण त्यातला योग्य अर्थ कोणी सांगितला असता?

आज टिळक असते आणि जर ते राजकारणात असते तर? भल्याभल्यांची शब्दांनी मुंडीच मुरगळली असती त्यांनी! कदाचित ते राजकारणात टिकलेही नसते. विवेक नक्कीच जागृत राहिला असता त्यांचा. भ्रष्टाचार,लाचारी,स्वाभिमानाचा अभाव ह्या दुर्गुणांविरुद्ध कडक शब्दात टिका केली असती. एकीकडे टिळक आणि दुसरीकडे उरलेले राजकारणी असा देखावा झाला असता. कारण टिळक एकटेच मनापासून जनतेसाठी झटले असते.

आज टिळक जर I.T. मध्ये असते तर? Software,hardware आणि network ह्या तीन शाखांमध्ये विभागल्या गेलेल्या ह्या क्षेत्रात टिळक तीनही विभागात गुरु झाले असते. कित्येक नवनवीन codes लिहिले असते त्यांनी. नवीन hardware configurations शोधली असती, आणि कित्येक नवीन topologies शोधल्या असत्या. भारतीय IT मध्ये कितीही पुढे असले तरी अजुन ते स्वतःची programming langauge बनवू शकले नाहीत. टिळकांनी कदाचित तीही बनवली असती. कारण कोणत्याही विषयाच्या मुळाशी हात घालायचा स्वभावंच होता त्यांचा!!

किंवा कदाचित टिळक न्यायशास्त्रातही गेले असते. तसं झालं असतं तर किती न्याय्य कायदे बनवले गेले असते! जुने पुराणे इंग्रजांच्या काळातले कायदे कदाचित आज वापरलेच गेले नसते, कारण इतिहासात टिळकांनी, हिंदुधर्माबद्द्ल इंग्रजांनी कायदे करण्याच्या विरुद्ध उठवलेल्या आवाजाचे दाखले आहेत. जातीवाद वाढवणा-या कायद्यांना तर टिळकांनी आवर्जुन विरोध केला असता.

असो, ह्या सगळ्या त्यांच्या आजच्या अस्तित्वाविषयीच्या कल्पना सोडल्या तरीही आज त्यांच अस्तित्व ही काळाची गरज आहे. टिळक स्वर्गातून हे सगळ बघत असतील तर रडतील का? छे, रडणं हा त्यांचा स्वभाव नाही. गीतेवर एवढा सखोल विचार केलेला माणूस मार्ग शोधेल, रडणार नाही. लोकमान्य,खरंच तुम्ही परत या हो!! देश आज जरी स्वतंत्र झाला असला तरीही समाज अजूनही अज्ञान,गरीबी,भ्रष्टाचार,लाचारी,पक्षपात,जातीवाद,धर्मवाद,अप्रामाणिकपणा,स्वार्थी राजकीय पक्ष ह्यांच्या विळ्ख्यात अडकून पडलाय. ह्या सगळ्या शत्रुंपासून मुक्त करण्यासाठी तुमच्यासारखाच खंबीर,बुद्धीजीवी नेता हवाय हो देशाला. देशासाठी रक्ताचं पाणी करणारा नेता हवाय. इथे आधीच सगळ्यांची शरीरे थंडगार पाण्यानी भरलेली आहेत!!! रक्ताची तर बात सोडाच...

Wednesday, March 28, 2007

भगवंताची प्राप्ती

१० मार्च, रात्री ८.४० वाजता मुंबई-नागपून विदर्भ एक्सप्रेस कल्याण स्टेशनवर येणार होती.
आम्ही आमच्या मातोश्रींनी घाई केल्याने पावणे आठलाच कल्याणला हजर!!!
५ नंबरच्या फलाटावर गाडी येणार असल्याने आम्ही तिथेच बॅगा ठेवून लोकांची गंमत बघत उभे होतो. माणसांनी तुडुंब भरलेल्या लोकल गाड्या एकीमागोमाग येत होत्या आणि तश्याच भरुन जात होत्या.

"८.३० झाले, येईल आता १० मिनिटांत गाडी." मातोश्री...

५व्या फलाटावर एक टिटवाळा आली आणि ती पुढे जाईच ना.. तिला बिचारीला हिरवा सिग्नल मिळतंच नव्हता. १०,१५,२० मिनिटं वाट पाहिली आणि शेवटी विदर्भ ६ नंबरवर लावली.

गाडी स्टेशनवर आली, आणि एका वडापाववाल्याने इंजिनाला नमस्कार केला,'आत्ता छान धंदा होऊ दे' असलं काहीतरी म्हणाला असेल.

आरक्षित जागांवर आम्ही बसलो. ५ मिनिटं थांबणारी गाडी २० मिनिटं झाली तरी हालेच ना!!! त्या वडापाववाल्याचा खरंच छान धंदा झाला असेल. थोड्या वेळाने 'आंबिवली,खडवली इथे over-head wire तुटली आहे' हे घोषित करण्यात आलं.
नेहेमीप्रमाणे या वेळीही शेगांवला जाताना प्रवासाच्या सुरुवातीलाच विघ्न आलं!

८.४०ला सुटणारी गाडी ११.०० वाजता सुटली.तब्बल २ तास २० मि. खोळंबा झाला.
पहाटे ४ ला शेगांवला पोहोचलो असतो, छानपैकी भक्त-निवासमध्ये जागा मिळाली असती, आणि शूचिर्भूत होवून ७.३० पर्यंत रांगेत आलो असतो. पण नाही. महाराज परीक्षा घेतात. जसं ठरवतो तस कधीच होत नाही. ७.३०ला गाडीच शेगावला पोहोचली. पुढे रिक्शाने भक्तनिवासावर गेलो तर ते भरलेलं. दुस-या एका हॉटेलवर २ रुम्स बूक केल्या फटकन. भराभर अंघोळी आटोपल्या, आणि एकदाचे दर्शनासाठीच्या रांगेत येउन ठाकलो. आम्ही सुरुवात केली तेव्हा ८.१५ झाले होते. रांग फार मोठी होती. अमाप भक्त येतात महाराजांच्या दर्शनाला. संस्थेने फार छान सोय केली आहे भक्तांची. सगळं काही शिस्तीने व्हावं ह्यासाठी एका मोठ्ठा हॉलचे ७-८ भाग केले आहेत. माणूस शेवटच्या भागापासून सुरुवात करुन सरकत सरकत हळूहळू पुढच्या भागात येतो. तो हॉल झाला की पुढचा हॉल!! प्रत्येक भागात भक्तांसाठी बसायला जागा आहे, जेणेकरून ३-४ तास भक्ताला उभं राहावं लागणार नाही आणि त्याच्या पायाचे तुकडे पडणार नाहीत!! रांगेतच काही लोक पोथीचं पारायण करतात, काही मुखाने जप करतात, काही नुसतेच इकडे तिकडे बघत असतात. भक्तांसाठी ठराविक अंतरावर पाणी घेउन काही स्वयंसेवक उभे असतात. त्यात काहीवेळा रांग सोडून मधेच कुठेतरी घुसायचा मोह होतो, एवढा वेळ लागतो. पण 'शिस्तीचा भंग केल्यास दर्शनाचा मंडप सोडावा लागेल' अशी पाटी दिसते, आणि वाटते,'आपण आहोत तिथे छान आहोत!'..

असेच त्या रांगेतून हळुह्ळु सरकत सरकत आम्ही दुस-या मंडपात गेलो.९.३० वाजले होते. दुस-या मंडपातून बाहेर येईपर्यंत ११ वाजले. तिथून संथगतीने पुढे सरकत होते लोक! ११.३० वाजता महाराजांची आरती सुरू झाली. महाराजांच्या जयजयकाराने आरती संपली.

आता अगदी हद्द झाली होती. तीन तासापेक्षा जास्त वेळ उभा होतो, अगदी ठरवून. बसायला जागा असूनही बसलो नव्हतो. एकतर महाराजांच्या दर्शनासाठी जीव आतूर झाला होता. कधी एकदा गाभा-यात त्या समाधीस्थानाशी येतोय अस झालं होतं!! पण अजून अर्धा तास तरी अवकाश होता त्याला. कारण रांग खुप संथपणे सरकत होती. आयुष्यात कधी केला नाही तेवढा जप त्या ३-४ तासात केला. असं ऐकलं आहे की, आपल्या आराध्यदैवताचा जप जेव्हा १ लाखापेक्षा जास्त होतो तेव्हा पत्रिकेतलं बारा घरांपैकी एक घर शुद्ध होतं. समर्थ रामदासांनी १३ कोटी जप केला होता. मी मोजला नाही पण भरपूर जप झाला त्यादिवशी. कारण तो एकच विषय डोक्यात होता.

हळूहळू करत समाधीजवळच्या रामाच्या मंदिराशी आलो आम्ही. महाराजांची रामावर नितांत श्रद्धा असावी. तिथले स्वयंसेवक ठराविक थोड्या थोड्या लोकांनाच आत सोडत होते. ज्यामुळे सगळ्यांना नीट दर्शन घेता येत होतं, बेशिस्तपणा कोस दूर होता.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं दर्शन घेतलं, आणि रांग पुढे सरकू लागली. तेवढ्यात गावातल्या कोण्या मुलाचं लग्न होतं, मुहूर्त गाठायचा म्हणून तो मध्येच घुसला, त्याचे पालक, बहीणी, इतर नातेवाईक असं लटांबरच मधे आलं. त्यात थोडा वेळ मोडला. अखेर आम्ही समाधीच्या द्वाराशी आलो. जिथे महाराजांनी समाधी घेतली, तिथेच त्यांचा देह ठेवला अन त्यावर त्यांची समाधी बांधली.

थोडं खाली उतरून आम्ही समाधीच्या अगदी समोर उभे, संगमरवरात घडवलेली महाराजांच्या मूर्तीच्या जागीच त्यांचा देह ठेवला हे वाचलं आणि खरोखरंच महाराज तिथेच बसले आहेत असं वाटलं. 'सब्रका फल मीठा होत है।' वगैरे सुविचार आठवला. तिथे त्यांच्यासमोर डोळे मिटून, हात जोडून उभा होतो, काही सुचत नव्हतं. ठरवलं होतं आत गेल्यावर खुप काही मागायचं. आपल्यासाठी, समाजासाठी. पण डोक्यातून सगळे विचारंच गेले. अगदी गहिवरल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात मागून कोणीतरी जोरात ओरडलं,


"अनंत कोटी ब्रह्मांडनायक,
महाराजाधिराज, योगीराज,
सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक,
शेगांवनिवासी, समर्थ सद्गुरु,
श्री गजानन महाराजकी जय"

मीहि मनात जय म्हणालो त्या ब्रह्मांडनायकासाठी.

बरोब्बर १२.१५ वाजता बाहेर आलो दर्शन घेउन. ४ तास रांगेत उभा राहिलो, तेव्हा ४ सेकंदांसाठी दर्शन लाभलं. कारण तिथले पुजारी आणि स्वयंसेवक हात जोडल्यावर लगेच,"चला चला, पुढे चला.." म्हणायला लागले. पण एकूण दर्शनासाठी कराव्या लागेलेल्या तपश्चर्येवरून, भगवंतप्राप्तीचा मार्ग किती खडतर असेल ह्याची जाणिव मला झाली. हे येरा गाबाळ्याचे काम नाही. कदाचित म्हणून रामदास स्वामी सांगून गेले-->प्रपंच करावा नेटका.......

Monday, January 15, 2007

सांगड

(कल्पना म्हणजे माणसाची कल्पनाशक्ती आणि वास्तवता, क्वचितंच जुळून येतं. आपण त्यांना तात्पुरतं दोन मुली समजू.)
म्हणजे कल्पना आणि वास्तवता ह्या दोन मुली. दोन्ही मुली देवाच्याचं. दोघींना देवानेच जन्माला घातलं. दोघीं भयंकर अहंकारी.

कल्पना : आज विश्वाच्या निर्मितीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे. ब्रह्मदेवाजवळ जर कल्पनाशक्ती नसती तर तो विश्वाची निर्मितीच करु शकला नसता. अनेक जिवाणू, प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यांचा जन्मंच झाला नसता. आज डोळे उघडे ठेवून जर बाहेर पाहिलं, तर जगात किती सौंदर्य आहे हे समजेल. रंगबेरंगी फुलपाखरं, निरनिराळ्या आकाराची, नाजुक-साजुक, ह्या फुलावरून त्या फूलावर उडतात तेव्हा बघायला किती गंमत वाटते!!! ती ज्या फूलांवरून फिरतात, ज्या फूलांमधला मधू शोषून घेतात ती फूलेदेखिल अनेक रंगांनी नटलेली, सजलेली वाटतात. एवढ्या सुंदर सुंदर, प्रत्येक दुसरीपेक्षा वेगळी अशी रंगसंगती त्या देवाला कशी बरं सुचली असेल? मी आहे ना ब्रह्मदेवाजवळ, चिंता कसली? पावसाळ्यात कधी फिरायला बाहेर पडलं कि कसं सगळं हिरवंगार दिसतं. त्या हिरव्या रंगांच्यादेखिल अनंत छटा आपल्याला दिसतात, आणि विशेष म्हणजे प्रत्येक छटा डोळ्यांना सुखावून जाते. माझ्या ताकदीचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे माणूस. दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ ...... अवयव तेच पण प्रत्येक चेहेरा निराळा आणि छान!!! त्याच्या साच्यातून आजपर्य़ंत अगणित सुंदर चेहेरे घडले, अजुनही घडताहेत आणि घडतील!!!!!!

ही सगळी माझ्या ताकदीची उदाहरणं आहेत केवळ. माझ्याशिवाय जगात काहीच होऊ शकत नाही!!! मीच सर्वश्रेष्ठ आहे.

वास्तवता : अगं तू असशील श्रेष्ठ पण तुला वास्तवात आणायला मीच कारणीभूत आहे. देवाला जर वास्तवतेचं भान नसतं तर आज तुझं ह्या धरेवर अस्तित्वच नसतं. अजुनही तुला तू किती श्रेष्ठ आहेस हे ओरडून सांगावं लागतं. तुझ अस्तित्व कोणालाही जाणवंत नाही. मी आहे म्हणून तुला किंमत आहे. तु सर्वश्रेष्ठ असशील तर तुझ्याहून मी चांगलीच पुढे आहे. मी सर्वोत्तम आहे. माझं अस्तित्व लोकांना १००% समजलंय आणि त्याचं महत्त्वही जाणलंय. तेव्हा तुच महान हा जो तुझा बोंबाटा चालला आहे तो बंद कर...........

अशाप्रकारचं त्यांचं हे अहंपणाचं बोलणं ऐकून देव त्यांना मधेच अडवून म्हणाला...

देव : तुमच्यात महान कोण ह्याचा निकाल लावायला फार वेळ नाही लागणार. तुम्ही जमिनीवर राहून आकाशाला हात लावायचा, जिचा हात आधी लागेल अर्थात तिच असेल सर्वश्रेष्ठ!!!


दोघींची स्पर्धा सुरू झाली......दोघी जीव तोडून प्रयत्न करत होत्या. वास्तवतेचे पाय जमिनीवर होते परंतु हात काही केल्या आकाशाला लागेनात! तर कल्पनेचे हात आकाशाला लागले पण पाय हवेत होते त्याचे काय!!!

अखेर देव त्यांना म्हणाला,

देव :
तुम्ही दोघीही महान आहात. तुमच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही.कारण तुम्ही एकमेकींना पुरक आहात. एकीशिवाय दुसरीचं महत्त्व नगण्य!! पण एक मात्र नक्की, ज्या वस्तुच्या निर्मितीमध्ये तुमच्या दोघींचा सहभाग आहे, ती गोष्ट आभाळालाएवढीच श्रेष्ठ असेल!!!!