Saturday, March 6, 2021

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा

सामान्य माणसाचं आयुष्यात काय ध्येय असतं? शिक्षणात उत्तम प्रगती, उत्तम नोकरी, खूप नाही पण निदान उच्चमध्यमवर्गात गणना होईल इतकी तरी आर्थिक श्रीमंती, उत्तम पत्नी, उत्तम अपत्ये, त्यांचे उत्तम आरोग्य, शिक्षण, नोकरी वगैरे वगैरे. ध्येय असेल तर आयुष्याला एक दिशा मिळते, जगण्यातली उर्मी टिकून राहाते. जगण्यात एक जिवंतपणा असतो. कालांतराने आपली ध्येयं, कर्तृत्व हीच आपली ओळख बनते.... अर्थात फक्त समाजात! 

समाजात असलेली ओळख हीच आपली खरी ओळख आहे असंच आपणही समजू लागतो. आपल्यालाही ती ओळख आवडत असते. इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, गायक, नोकरदार, कामगार, स्त्री, पुरुष आणि इतर अनेक पदं..... इतकंच काय, मी रामभक्त, मी कृष्णभक्त, मी शिवभक्त, मी स्वामीभक्त, आणि कोणाचे भक्त हेही छाती फुगवून सांगतो. प्रतिष्ठा सगळ्यांना आवडते. समाजात मान मिळत असतो. अहंकार पुष्ट होत असतो. त्यामुळे सगळं आवडत असतं. समाजातलं स्थान, प्रतिष्ठा सांभाळताना, समाजाला आवडणारी आपली प्रतिमा सांभाळताना नकळत या अहंकाराचं ओझं आपण सतत वाहू लागतो. आणि या सगळ्या भानगडीत आपण नक्की कोण आहोत हेच विसरून जातो. ध्येयापर्यंत पोहोचायच्या नादात आयुष्याचा हेतूच जाणून घेत नाही अथवा विसरून जातो.

अर्जुनाला कर्मयोग आणि भक्तियोग सांगण्यापूर्वी सांख्ययोग म्हणजे शुद्ध ज्ञानयोग सांगून कृष्णाने त्याला आरसाच दाखवला आहे. 'स्व'रुप समजल्यावर अर्जुन निर्मोही झाला. मोह, व्देष आणि मत्सर यांच्या पलीकडे जाऊन शुद्ध कर्तव्यबुद्धीने युद्ध करु शकला. सावकारीचा धंदा करताना लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणाऱ्या तुकोबांना जेव्हा आत्मदर्शन झालं तेव्हा त्यांचं मनोगत होते;

पावले पावले तुझे आम्हा सर्व
नको दुजाभाव होऊ देऊ

जेथे देखे तेथे तुझीच पाऊले
त्रिभुवन संचले विठ्ठला गा...

'स्व'-रुप समजलं, अव्दैत अनुभवलं, तुकोबा वृत्तीने संन्यस्त झाले. 

बरं, मी परमात्म्याचा अंश असलेला आत्मा आहे, त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याला काहीही मर्यादा नाहीत, आणि माझ्यासारखेच आजुबाजुचे सगळे जीवही परमात्म्याचाच अंश आहेत. म्हणजे आपण सगळेच एकाच घराच्या निरनिराळ्या खोल्यांसारखे स्वतंत्र, पण एकत्र, एकमेकांशी जोडलेले आहोत. एका खोलीत उठलेली आनंद वा दुःखाची कंपनं सगळ्या घरात पसरतात. कारण आपण जोडलेले आहोत, आपल्यात अद्वैत आहे.. पण, अहम् बह्मास्मि हा अनुभव मी सतत कसा ध्यावा? ध्यानाच्या माध्यमातून समाधीचा अनुभव. म्हणजे २४ तासातली १५-२० मिनिटं आपण ध्यान करू आणि त्यातही चित्त स्थिर होऊन समाधी लागेल २-४ क्षण तेंव्हाच. हे २-४ क्षण केव्हा येतील किंवा कधी येतील तरी का या जन्मी ही स्थिती! 'मी अबक नाही, आत्मा आहे. अबक हे तर मी ग्रहण केलेल्या देहाचं नाव आहे.' हे भान सतत कसं राखावं? कारण माझा तर अगदी लीलया अपमान होतो, जीभेला खुष करणारे पदार्थ मला भरल्यापोटीही खावेसे वाटतात, आणि ते समोर आले की मी पोटापेक्षा जीभेचा विचार करून खातो. कोणाकोणाबद्दलचा राग, व्देष मी वर्षानुवर्ष उराशी बाळगतो. चित्ताच्या वृत्ती सतत उसळत असतात, क्लेश देत असतात. मी अबक नाही, आणि मी या सगळ्याच्या पल्याड अज, नित्य, शाश्वत, पुराण, अचल, अविनाशी, अविकारी आत्मा आहे, याचा मला वारंवार विसर पडतो. त्यामुळे मी सगळ्यांशी जोडलेला असूनही तसं अनुभवू शकत नाही. तेव्हा, मी सांख्ययोग  कसा आचरावा, अनुभवावा? 

गजानन महाराज अखंड गणी गण गणांत बोते असा जप करत असा पोथीत उल्लेख आहे. त्या जपाचा अर्थ 'सर्व जिवात्म्यांना शिवात्म्यात मोज' असा आहे हे ही पोथी वाचून समजतं. याचा सरळ अर्थ असा होतो, की गजानन महाराज जप करत नसून अखंड अहम् ब्रह्मास्मि अनुभवत होते. दैनंदिन जीवनात मन भरकटवणाऱ्या अनेक प्रसंगात भानावर राहून निःसंगपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. आणि गणी गण गणात बोते हा एक जप करत नसून स्वतःच्या आत्मरूपाची स्वतःला आठवण करून देत होते. अखंड आत्मस्वरूपाचं भान ठेवणं हेच खरं ध्यान आहे आणि त्यामुळे शमलेल्या चित्तवृत्ती हीच समाधी अवस्था आहे. महाराजांचं नामस्मरण करण्याच्या दृष्टीने गणी गण गणांत बोते  या मंत्राला काही अर्थ नाही, ती एक आठवण आहे आत्मरूपाची!

काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीशी माझी ओळख झाली. ती व्यक्ती गुरुभक्त होती. मग आपल्या घरी गजानन महाराजांची होत असलेली उपासना मीही मोठ्या तोंडाने सांगितली. 'काय उपासना करतोस?' या प्रश्नावर 'पोथीवाचन' याशिवाय आणि काय सांगणार! पण खरंच एवढंच पुरेसं आहे का? पोथीलेखन करून दासगणू महाराजांनी एकप्रकारे गंगातट दाखवला आहे.... 'बघा ही आहे पवित्र गंगा! हीच्या काठावर नुसतं बसायचं, पाण्यात पाय सोडून बसायचं, की पाण्यात डुबकी मारायची हे ज्याचं त्याने ठरवायचं.' आपण जेव्हा स्वतःला महाराजांचे भक्त म्हणवतो तेंव्हा पोथीवाचन हे उत्तम भक्त असण्याचं प्रमाण असतं का? किंबहुना आपणचं आपल्या भक्तीचं प्रमाण द्यावं का? आणि जेव्हा आपण महाराजांना गुरूस्थानी मानतो, तेव्हा आपण भक्ताच्या भूमिकेत असावं की शिष्याच्या? भक्त हा शिष्य असेलंच असं नाही, पण शिष्य हा भक्त नक्की असेल. भक्त हा अनेकदा नकळतपणे मूळ शिकवण न समजता व्यक्तिपूजेत अडकतो. महाराज वैराग्यात बुडालेले होते. पूजा झाली काय, नाही झाली काय; त्यांना सगळं सारखंच. शिवाय एक भूमिका अहंकारयुक्त आहे आणि दुसरी समर्पणाने युक्त. 'शिष्यस्तेहम् शाधि माम् तां प्रपन्नम्' असा अर्जुनाचा समर्पणभाव होता तेंव्हा कृष्णाने गीता सांगितली. आणि समर्पणाशिवाय भक्तीभाव दाटणं शक्य नाही. त्यामुळे निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. वैराग्य - ही आहे महाराजांची खरी शिकवण! स्व-रूप ओळखून प्रारब्धात आलेले चांगले वाईट भोग निःसंगपणे भोगणे, ही आहे महाराजांची खरी शिकवण. आणि 'गणी गण गणांत बोते' हे आहे निःसंगपणे जगण्याचं सूत्र! स्व-रूपाचं भान राहिल्याशिवाय वैराग्य अशक्य आहे. अबकचे प्रश्न अबकचे आहेत. अबकची सुखं अबकची आहेत. मी अबकमध्येही असलो तरी अबक ही माझी ओळख नाही. नित्यः सर्वगतः स्थाणूः अचलोयम् सनातनःI अबक यातला कोणीही नाही, ह्याचं भान राहण्यासाठी अबकला संसार सोडायला नको, की संन्यास आश्रम धारण करायला नको. 'गणी गण गणात बोते'चा अर्थ ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं पुरेसं आहे. गणी गण गणांत बोते ही महाराजांची शिकवण आहे, नामस्मरण नाही. अवघं अध्यात्म सामावलं आहे या एका सूत्रात! यातून येणारी अलिप्तता ही अंतिमतः वैराग्याकडे घेऊन जाणारी असेल. आणि हे वैराग्य निश्क्रियतेकडे झुकलेले न राहता कृष्णाने अर्जूनाला सांगितल्याप्रमाणे 'योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, सिद्धयसिद्ध्याः समो भुत्वा समत्वं योग उच्यते' असं असेल!
स्वयंपाक करायचा आहे, करू - गणी गण गणात बोते
लादी पुसायची आहे, पुसू - गणी गण गणात बोते
मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, घेऊ - गणी गण गणात बोते
मुलांशी खेळायचं आहे, खेळू - गणी गण गणात बोते
जेवायचं आहे, जेवू - गणी गण गणात बोते
ऑफिसची मीटिंग आहे, अटेण्ड करू - गणी गण गणात बोते
लग्नसमारंभाला मिरवायचंय, मिरवू - गणी गण गणात बोते
बायकोशी वाद चालू आहेत - गणी गण गणात बोते
मयतीला जायचं आहे - गणी गण गणात बोते
कोणी टोमणा मारतंय - गणी गण गणात बोते
कोणाला टोमणा मारायचाय - गणी गण गणात बोते
कोणाबद्दल मनात राग बसलाय - गणी गण गणात बोते
कोणाबद्दल द्वेष, मत्सर वाटतोय - गणी गण गणात बोतेहो
कोणाकडे माफी मागायची हिंमत नाही - गणी गण गणात बोते
कोणाला माफ करवत नाही - गणी गण गणात बोते
आयुष्य संकटांनी भरलयं - गणी गण गणात बोते
.... अतिशय कठीण आहे, पण अशक्य नक्की नाही. इथवर हात धरून आणलंय महाराजांनी, यापुढे तरी हात कसा सोडतील! त्यामुळे, जेव्हा आठवण होईल तेव्हा, जिथे आठवण होईल तिथे, १५-२० मिनिटांच्या ध्यानाशिवाय गणी गण गणात बोतेचं 'ध्यान' रोज २४ तास चालू ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं हीच खरी साधना आहे, आणि हीच महाराजांप्रती असलेली भक्ती आहे.

गणी गण गणात बोते


Tuesday, October 10, 2017

निरभ्र मन



"..... पण अरे, गेली पाच वर्षं माझ्या आयुष्यात अनेक खडतर वळणं समोर आली. काही माझ्याच निर्णयांमुळे तर काही इतरांच्या. अर्थात त्यांच्या निर्णयाचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतोय यालाही अप्रत्यक्षरित्या मीच जबाबदार आहे, कारण मीच त्यांना माझ्या आयुष्याचा भाग बनू दिलं. साडे-पाच वर्षांपुर्वी लग्न झालं... हेहे, प्रेमविवाह! अत्यंत सुशिक्षित, सुशील, यशस्वी आहे माझा नवरा, आणि अभिमान आहे मला त्याचा असं मत होतं माझं. पण actually उंबरा ओलांडून घरात आले आणि सहा महिन्यात समजलं, जगातला सगळ्यात नाकर्ता पुरुष कोणी भेटला असेल तर तो हाच!

याचा दिनक्रम सांगायचा म्हणजे कुठुन सुरुवात करायची हा एक मोठा प्रश्नच आहे. कारण हा झोपतो रात्री अडीच-तीन वाजता. जागून करतो काय, तर दारु पिता पिता TV पाहणे. एवढी ढोसून झोपल्यावर उगवता सुर्य बघणं सोडाच, कधी माध्यान्हीचं ऊनही पाहात नाही कारण उठतोच अडीच-तीननंतर. मी या अशा माणसावर नव्हतं केलं रे प्रेम. हा असा नवरा नको होता मला. मला कर्तृत्ववान नवरा हवा होता आणि याच्याशी नातं जुळत असताना यानेही तसंच चित्र उभं केलं होतं स्वत:बद्दल. मीच मूर्ख, मोहाला फसले. याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला कसलीही शहानिशा केली नाही. कसाबसा दहावी झालाय रे हा. वडिलोपार्जित गडगंजं श्रीमंती आहे, एकटा मालक आहे सगळ्याचा. पिढ्या नुसतं बसून खातील, म्हणून आपण खरंच नुसतं बसून खात राहायचं का? आपकमाई काहीच नको का? बापकमाईवरंच आयुष्य घालवणं मला नाही पटत. मी याला सतत encourage करत राहिले. याच्या घरच्यांचा त्याला विरोध. समीरला काम करायची गरज नाही, त्याला हवं ते करू दे असा सल्ला मिळाला त्याच्या घरच्यांकडून. तरीही मी धोशा लावलाच होता, की मला तु किती कमवतोस हे महत्त्वाचं नाहीये, तु कमवतोएस हे महत्त्वाचं आहे. स्वावलंबन महत्त्वाचं आहे. पण काही उपयोग झाला नाही. लवकरंच मला दिवस गेले, म्हटलं आता फरक पडेल, पण नाही. पुढे मुलगी झाली, तरीही बदल शून्य! गंमत म्हणजे प्रेग्नंसीच्या काळात याने दुसऱ्या एका मुलीसोबत affair केलं, चालू आहे. ठिके, आम्ही जास्त physical नाही झालो. पण खरंतर जेव्हा मला एका मित्राची खूप गरज होती तेव्हाही मीच त्याची कायम उत्तम मैत्रिण बनून होते, हर तऱ्हेने. पण याला त्याचीही पर्वा नव्हती. माझा अनादर मला जाणवू लागला आणि मी आरोहीला उचलून माहेरी आले. सुरुवातीला काही महिने राहिले तिथे, ते काही बोलले नाहीत, पण मलाच या वयात त्यांच्यावर भार बनून राहणं रुचेना. एका शाळेतल्या मैत्रिणीशी योगायोगाने contact झाला आणि चित्रं बदलंल.

कॉलेजमध्ये असताना झुंबा, योगा, पॉवर योगा वगैरे जे जे शिकले त्याचा उपयोग झाला आणि पहिलं फिटनेस सेंटर उभं राहिलं. पसारा वाढतोय आता. त्यातही अनेक अडथळे आले. पण घरच्यांच्या आणि friends च्या पाठींब्यामुळे दरवेळी मार्ग निघत गेला. तुला तर ठाऊक आहेच सगळं", मी.

"हं, पुर्वीही तु हे सगळं मोघम बोलली होतीस. करोडोंच्या संपत्तीवर, ऐषोआराम लाथाडून तू तुझ्या तत्त्वांची कास धरलीस. फार आदर आहे तुझ्याबद्दल. मी कायम सोबत आहे तुझ्या" ‍ॠतुपर्ण.

"Thanks नाही म्हणणार. But yes, I am full of grattitude for you all. माझ्या पडत्या काळात वेळोवेळी मला सावरलंय, तोल जायचे अनेक प्रसंग आले, दिशाहीन होण्याचे क्षण आले. तुम्ही सगळ्यांनी माझी गाडी कायम रुळावर राहिल याची काळजी घेतलीत. फार lucky आहे मी या बाबतीत. Anyway, I am sorry. प्रसंग काय, मी बोलत्ये काय. छान night at river-shore camp ला आलोय आपण. छान दंगा घालून झालाय सगळ्यांचा. पांगलेत सगळे आता. शांत आहे सगळं. मिट्ट काळोख आहे, नदीची संथ खळखळ आहे, ताऱ्यांनी भरगच्च आभाळाखाली आपण छान पहुडलोय. गार झुळुका येताएत. सगळी सृष्टी प्रसन्नतेची उधळण करत्ये. आणि मी, रडगाणं गात बसल्ये."

"शमिका प्लीज, तुझ्या मनात काहूर माजलं होतं, खुप सारा गाळ साचला होता, तो आता कुठे सुटतोय आणि म्हणून तू हे सौंदर्य अनुभवत्येस. बरं झालं आपण आत्ता इथे थांबलोय, तु बोललीस सगळं. नाहीतर बाकीच्यांसारखी तूही हॅहॅहुहु करून गेली असतीस तंबूत. या camp चा खरा USP तर हा माहौल आहे. जो एवढ्या सगळ्या लोकांमध्ये फक्त आपण अनुभवतोय."

"खरंय. Thanks यार, तु कायम माझा point of view बदलंत आलाएस. तुला सांगते, मी फिटनेस क्लासेस घेते, students ना सांगते फिटनेसबद्दल, physical, mental fitness. गंमत म्हणजे मला स्वतःलाच मी mentally fit  आहे असं वाटत नाही. भविष्याबद्दल दाट अंधार आहे. आयुष्याचं गणित चुकलंय, समीकरणं जुळत नाहीयेत, सगळं planning कोलमडून पडलंय. तीन-साडेतीन वर्षांची मुलगी, संसार विस्कटलेला, त्यातही सोक्षमोक्ष नाही. समीर घटस्फोटही देत नाही कदाचित मी अव्वाच्या सव्वा पोटगी मागेन अशी भिती असेल. मी कुठे जाते, काय करते याची इत्थंभूत माहिती त्याला हवी असते, पण आमच्यासाठी काही धडपड करायची नाहीये. त्याच्या या निर्णयामुळे मी न तळ्यात न मळ्यात. मध्येच लटकल्यासारखं झालंय. माझ्या वयाची मुलंमुली बघ, आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे योग्यवेळी येतात त्यांच्या आयुष्यात. चार लोकांसारखं आयुष्य जगतात. आणि मी! जेमतेम तिशीत आईपण आणि एकटेपण! काय वाढुन ठेवलंय पुढे? अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य बाकी आहे, कसं जाणारे ते? जाम टेन्शन येतं रे! हसते, बोलते, काम करते, पण मनात हे दडपण कायम आहे. कठीण आहे असं आयुष्य जगणं. किती उत्साही होते रे मी! काय वळणावर आलंय आयुष्य! काय अर्थंय रे अशा आयुष्याला!" माझं बोलणं ऐकून ॠतु हसायला लागला तो थांबेचना! फारंच विचित्र वाटलं मला, हसतोय की रडतोय, हेच कळत नव्हतं त्या अंधारात. पण हसतंच होता वेड्यासारखा.

"बोल ना, का हसतोएस एवढं ॠतु?" काही वेळ गेल्यावर हसणं आवरत अखेर साहेबांनी तोंड उघडलं.

"बोलायचं आहेच, पण ते इतकं आहे की त्याची सुरुवात आणि शेवटंच मिळत नाहीये. शोएब अख्तरचं बरं होत, रन-अप मोट्ठा होता त्याचा. पण सुरू कुठुन करायचं आणि थांबायचं कुठे हे त्याला नक्की ठाउक होतं. तुझ्या हतबलतेचं उत्तर आहे माझ्याकडे सुदैवाने, पण आपल्या सनातन धर्मासारखं आदि आणि अंत ठाऊक नसलेलं आहे."

"ॠतु बास, बोल आता"

"हं... तर...! आपण सगळेच फार गोंधळलेले आहोत गं, तू एकटीच नाहीस तशी. मगाचपासून आपण अनेक छोटी छोटी पाखरं, किडे मारले. काही त्या आगीतपण मेली असतील. घरी झुरळं, पाली, मुंग्या मारतो. असे कित्येक प्राणी, पक्षी, झाडं-झुडपं जन्माला येतात आणि मरतात. काय असेल त्यांच्या आयुष्याचं प्रयोजन, प्लॅनिंग? काही नाही... खायचं-प्यायचं, खेळायचं, जोडीदारासोबत ऐश करायची, संख्या वाढवायची आणि एक दिवस मरायचं, संपलं आयुष्य. आणि आपण माणसं? जसे हे सगळे सजीव निसर्गाचा हिस्सा आहेत, तसेच आपणही आहोत ना? आपणही एक दिवस जन्माला येऊन कधी ना कधी मरणारंच आहोत, रादर मरतोच. आपल्या आधी काही पिढ्या गेल्या, कोण आहे त्यातलं? फार कमी लोकांना त्यांचे पणजोबा, खापर पणजोबा आणि त्यांचे पूर्वज महिति असतील. बाकी सगळे विस्मृतीतंच गेलेत ना? त्यांनीही आयुष्यात संपत्तीचा संचय केला असेल, मानमरातब मिळवळा असेल, आय़ुष्याचं प्लॅनिंग केल असेल, काय झालं त्याचं? कोणाच्या असेल लक्षात? काय होतं माझ्या खापर पणज्याचं आयुष्याचं ध्येय, स्वप्नं? nobody knows. मगाशी म्हटलं ते सगळे जीव आणि माणूस, दोघांचंही सगळं सारखंच आहे. मग आपण जन्म आणि मृत्यु याच्यामध्ये होत असलेल्या देहाच्या स्थित्यंतराला आयुष्य मानून ते प्लान का करतो? फोल नाही वाटत का सगळं? मानमरातब, पैसा अडका, कुटुंब वगैरे सगळ्या माणसाच्या कल्पना नाही वाटत का? मरणोत्तर सन्मान, आयुष्याचं गणित, बालपणात शिक्षण, तारुण्यात लग्न, मग संसार, मुलंबाळं, मग त्यांचं शिक्षण, तारुण्य, लग्न, नातवंडं.... अरे काय! हे सगळं जो करू शकला नाही तो अयशस्वी का? आयुष्य वाया? आणि जो हे करू शकला तो यशस्वी? मला वाटतं यश-अपयश, कीर्ती-अपकीर्ती, मानापमान, हार-जीत वगैरे सगळ्या माणसाच्या आयुष्याला विनाकारण चिकटवलेल्या संकल्पना आहेत आणि त्या अतिशय क्षुल्लक आहेत. मुळात एक जीव म्हणून आपण जगलो काय, मेलो काय त्याने जगात कोणाचंच काहीच बदलत नाही. सगळं सुरळीत चालू राहातं. सृष्टीच्या चक्रात आपण कधी येऊन जातो याने सृष्टीला काहीच फरक पडत नाही. एवढं परिणामशून्य आपलं आयुष्य आहे, किती काळाचं? ६०-७०, कधी कधी ९०, अगदी क्वचित १०० वर्षांचं. ती वर्षं म्हणजे तरी काय तर पृथ्वीचं स्वतःभोवती आणि सुर्याभोवती प्रदक्षिणा घालणं, ज्याला आपण दिवस-रात्र, आठवडा, वर्ष वगैरे मानतो. म्हणजे ही वेळपण काल्पनिक. किती तात्पुरतं आहे माणसाचं आयुष्य! तर अशा या तात्पुरत्या आयुष्यात घडलेले प्रसंग किती तात्पुरते असतील याचा विचार कर. पण आपण त्यांना कवटाळून बसतो, केंद्रस्थान देऊन. मग आपल्या बुद्धीने निर्माण केलेल्या संकल्पना, कल्पना किती फुटकळ असल्या पाहिजेत जर आपलं आयुष्यंच इतकं सामान्य असेल तर. निसर्गाच्या लेखी अनेक जीवाप्रमाणे माणुसपण फक्त एक जीव आहे जो कधीतरी जन्मतो आणि मरतो. तर या अतिसामान्य संकल्पनांना अतिमहत्त्व देऊन, आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग मानून आपण आपलं आयुष्य क्लीष्ट नाही केलंय का? नीतीनियम, धर्म, जात, वगैरे सगळ्या संकल्पना काळानुरुप ध्वस्तं होतात, बदलतात. यातलं काहीच स्थिर नाहिये. आपण खूप जास्त गांभिर्याने बघतोय आयुष्याकडे. व्यर्थ आहे सगळं, नाही का? तू, मी, आपले नातलंग, इथे जमलेले लोक, आज ना उद्या आपल्यातलं कोणी नसणारे इथे, गायब असणारेत सगळे. अथक प्रयत्न करून मिळवलेलं शिक्षण, नोकरी, पैसा, कमावलेलं नाव यांचं जिवंतपणी जगण्याचं एक साधन याखेरीज अजून काय मोल आहे? लोकांनाही विसर पडेल आपला पूर्णतः! मग कसलं गणित मांडायचंय? कसला हिशोब चुकतोय? कोणतं समीकरण जुळवणारेस? चूक-बरोबरच्या संकल्पना.. सगळं वरवरचं आहे. आयुष्य नको घेऊस एवढं मनावर. कसलाही stress, load नको घेऊस. येणारा प्रत्येक क्षण जग, अनुभव. येणारं प्रत्येक संकट एन्जॉय कर. कारण त्या संकटात लौकिकार्थाने कसाही निकाल लागला तरी तो परत काल्पनिक असेल कारण हार-जीत या मानवनिर्मित संकल्पना आहेत. बस्स, dettach yourself from the results of the situations, decisions taken by you, incidents, liberate yourself from this cage of typical thought-process, enjoy every moment. Keep enjoying every 'this-moment' till the end of this life. जर तू स्वतःला कोणत्या प्रसंगाशी जोडणार नसशील तर जे घडणार असेल ते चांगलंही नसेल आणि वाईटही नसेल कारण तु तटस्थ असशील. एवढं सरळ, सोपं आहे आयुष्य. do value it, do respect it, just give it importance as much as it deserves. are you following me? am I making sense?" ॠतू.

मी फक्त मान हलवली, होकारार्थी, नकारार्थी, कशीतरी. त्याला तरी कुठे दिसली असेल अंधारात नेमकी! पण ॠतुने जे काही सांगितलं ते ऐकुन डोकं सुन्न झालं, एकदम रिकामं झाल्यासारखं वाटलं. आम्ही तसेच पहुडलो होतो त्या वाळुत, आजुबाजुला सुंदर शांतता होती पहाटेची, हवेत गारवा, नदीच्या संथ लाटांची खळखळ, निरभ्र आभाळ, चांदण्यांनी भरलेलं, निरभ्र मी, डोक्यात प्रकाश पडलेली. कमालीचं हलकं वाटत होतं. एखादं भयानक स्वप्न बघत असतो आपण. अचानक जाग येते आणि समजतं shit, मी स्वप्न बघत होते, जे स्वप्नात घडत होतं ते खरं मानत होते. आपण परत relax  होतो. असंच काहीसं वाटू लागलंय. आयुष्य पण स्वप्नवतंच वाटू लागलंय, आणि तितपतंच महत्त्वाचं!

--ओंकार घैसास